भाई वैद्य एक प्रगल्भ विचार – पुरुषोत्तम सदाफुले
पुणे प्रतिनिधी
महा पोलिस न्यूज ऑनलाइन पुणे
पिंपरी, दि. २ : समाजवादी विचारवंत व माजी गृहमंत्री भाई वैद्य यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्रतर्फे चिंचवड येथे “भाई वैद्य आणि कामगार” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भाई वैद्य यांनी मोठी पदे भूषवूनही त्यांच्यातील साधेपणा कधीही कमी झाला नाही. निरपेक्ष भावनेतून त्यांनी समाजासाठी उंच कामगिरी केली. पिंपरी-चिंचवडशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. “भाई वैद्य हे एक प्रगल्भ विचार होते,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
सदाफुले पुढे म्हणाले की, समाजवादी विचारांचे पुरस्कर्ते भाई वैद्य आयुष्यभर सामाजिक समता आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांसाठी लढत राहिले. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य केले. अम्युनिशन फॅक्टरीत संघटनात्मक काम करत त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला. “पाणी वाहत जाऊन नदीत मिळाले की गंगाजळ होते आणि आपल्या हातात आले की तीर्थ होते, त्यामुळे कामगारांचे हात श्रेष्ठ आहेत,” असे सांगत त्यांनी कामगारांच्या शक्तीवर विश्वास व्यक्त केला. कामगारांच्या ताकदीतून बलशाली राज्य उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास श्रमश्री बाजीराव सातपुते, कामगार कवी प्रभाकर वाघोले, महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, निमंत्रक सखाराम केदार, राजेश माने, शारदा तांबे, शीतल अनुसे, नौसीन तांबोळी, सुमैय्या पठाण, अंबिका घुमटे, शिला सरदार, निलावती पचारे, पूजा वाशीमकर, अशोक पोळ, बाबासाहेब खराडे, धनाजी लिमकर, सुनील जाधव आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाजीराव सातपुते यांनीही भाई वैद्य यांच्या आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या.


