लोणावळा: एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेल्याने पुण्यातील सय्यदनगर परिसरावर शोककळा …
पंकेश जाधव संपादक 7020794626
पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणावळ्यातील भुसी डॅम परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूशी डॅम परिसरात फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबात चार दिवसांपूर्वीच एक विवाह झाला होता. त्यामुळे या नवदाम्पत्यासह घरातील व नातेवाईक लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले.
१७ सीटर बस करून येथून गेलेल्या कुटुंबातील तीन मुली, मुलगा व महिला असे पाच जण वाहून गेले. नवदाम्पत्य यात वाहून गेले होते, ते वाचले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असून, रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. वाहून गेलेल्यांपैकी चौघांचे मृतदेह बाहेर काढले. रात्र झाल्याने शोधकार्य थांबवले असून, सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू होणार आहे. तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.
शाहिस्ता नूर अन्सारी (वय ३५), अमिना आदिल अन्सारी (१३), मारिया अन्सारी (७), हुमेदा अन्सारी (६), अदनान अन्सारी (४ वर्षे, सर्व जण रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. येथील पाणी कमी असल्याने ते खडकावर बसले होते. डोंगरमाथ्यावरून मोठा पाऊस पडल्याने हे पाच जण वाहून गेले. ही घटना दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.
सय्यदनगर येथील मौलाना असलेले सलमान अन्सारी यांच्या दोन मुली, त्यांची मेहुणी व मेहुणीची एक मुलगी आणि मेहुण्याचा एक मुलगा असे पाचजण या पुरात वाहून गेले. सलमान अन्सारी यांच्या दोन मुली हांडेवाडी येथील शाळेत शिकत होत्या. ही चारही मुले लहान असून त्यांची मेहुणी नूर अन्सारी ही घरकाम करत होती. तर मेहुणे यांची बेकरी असून त्यांचाही मुलगा यामध्ये वाहून गेला. या घटनेने सय्यदनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

